इटाह जिल्ह्यातील देहात परिसरात रेल्वे उड्डाणपुलाजवळ रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूण, त्याचा चुलत भाऊ आणि तरूणी दुचाकीवरून जात होते. रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही मृत्यू झाला. हे तिघेही कोतवाली नगर परिसरातील एका गावातील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की, तरूण आणि तरुणीचा मृत्यू जागीच झाला. तर तरुणाच्या चुलत भावाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात चुलत भावाने सांगितले की, तरूण आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळून जात होते. तो स्वतः या दोघांना दुचाकीवरून कासगंजला सोडण्यासाठी जात होता. त्याचवेळी अपघात झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.