हायलाइट्स:
- अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया.
- देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार.
- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला धक्कादायक दावा.
वाचा: ठाकरे सरकारला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्या अटकेआधी नेमकं काय घडलं?
‘शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुली, गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात अखेर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे’, अशाप्रकारचे ट्वीट किरीट सोमय्या यांनी अटकेच्या बातम्या आल्यानंतर आठव्या मिनिटाला केलं आहे. साधारण दीड वाजताच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आल्याची बातमी ब्रेक झाली होती. त्यानंतर लगेचच सोमय्या यांनी ट्वीटसह व्हिडिओ पोस्ट करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. अनिल देशमुख यांच्या अटकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टेन्शन आता वाढणार आहे. दरमहा १०० कोटींची जी वसुली येत होती त्यातील पवार यांच्याकडे किती पैसे पोहचते व्हायचे आणि ठाकरेंकडे किती जायचे, याचे उत्तर आता द्यावे लागणार आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अनिल देशमुख सोमवारी नाट्यमयरित्या ईडीसमोर हजर झाले होते. देशमुख गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यांना ईडीकडून वारंवार समन्स पाठवण्यात येऊनही ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. असे असतानाच ट्वीटरच्या माध्यमातून आपण आज ईडी कार्यालयात हजर होत असल्याचे देशमुख यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जाहीर केले. ट्वीटरवर व्हिडिओ संदेश व खुलं पत्र जारी करत निर्दोषत्वाचा दावा त्यांनी केला व निष्पक्ष चौकशीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर ईडी कार्यालयात दाखल झालेल्या देशमुख यांची तब्बल १२ तास चौकशी चालली व या चौकशीअंती त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.