हायलाइट्स:
- उत्तर प्रदेशात घातपाती कारवाया?
- ‘लष्कर ए तोयबा’कडून धमकीचं पत्र
- दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट घोषित
दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा‘कडून अयोध्य, लखनऊ, वाराणसी यांसहीत राज्यातील ४६ रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. शनिवारी रात्री उशिरा मिळालेल्या गुप्तचर संघटनांच्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर एकच खळबळ उडालीय. यानंतर उत्तर प्रदेशच्या सर्वच रेल्वे स्टेशन्सवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, हापुड रेल्वे स्टेशन अधीक्षकांना टपालाद्वारे एक पत्रं मिळालंय. यामध्ये, ‘लष्कर ए तोयबा’कडून २६ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील हापूर, गोरखपूर, लखनऊ, खुर्जा, अलीगढ, कानपूर, तुंडला, बरेली आणि मुरादाबाद ही रेल्वे स्थानकं बॉम्बस्फोटात उडवली जातील अशी धमकी देण्यात आलीय. तसंच ६ डिसेंबर रोजी प्रयागराज, अयोध्या, हरिद्वार, उज्जैन, मुंबई आणि अहमदाबादची मंदिरं बॉम्बनं उडवण्यात येतील, असा उल्लेखही या पत्रात आहे.
रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक धमकीचं पत्र मिळालंय. दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’कडून हे पत्र पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. मोहम्मद अमीम शेख नावाच्या लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरनं हे पत्रं पाठवल्याचं समजतंय. आपण जम्मू काश्मीर आणि कराची भागाचा कमांडर असल्याचा दावा पत्र पाठवणाऱ्या मोहम्मद अमीम शेख नावाच्या व्यक्तीनं केलाय. या पत्रात ऐन दिवाळीत देशातील विविध रेल्वे स्थानकं बॉम्बस्फोटात उडवण्याची धमकी देण्यात आलीय.
यानंतर रेल्वे प्रशासनाकडून आणि सुरक्षा यंत्रणेकडून जीआरपी, आरपीएफ आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीनं रेल्वेच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येतोय. सर्व स्टेशनवर तपास यंत्रणा कामाला लागल्यात. रेल्वे स्टेशनवर कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाली आढळल्यास त्याची कसून तपासणी करण्याचे आदेश सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.