काही दिवसांपूर्वीच विखे पाटील आणि मंत्री थोरात यांनी एकमेकांवर समन्यायी पाणीवाटप कायद्यावरून टीका केली होती. थोरात यांनी केलेल्या टीकेसंबंधी विचारले असता विखे यांनी त्यांना फार महत्व देत नाही, असे म्हणून उत्तर देणे टाळलं. मात्र, पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या मंत्री व दलालांचे साटेलोटे रोज समोर येत आहे. राज्यातील काही प्रकरणे उघड झाल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री अडकलेला असल्याचं लवकरच समोर येईल. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता ते ईडी आणि सीबीआयवर आरोप करू लागतील. आपली पापे झाकण्यासाठी तपास यंत्रणांवर आरोप केले जात आहेत. या संस्थांना बदनाम करून आपली पापे त्यांना झाकता येणार नाहीत,’ असंही विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, ‘महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारात अडकलं आहे. मोठमोठ्या हॉटेलात आता सरकारच्या दलालांचे अर्थिक व्यवहार होत आहेत. राज्य सरकार करोना प्रतिबंधक लस खरेदी करायला निघाले होते. मात्र, केंद्र सरकारनेच ही लस मोफत पुरवली. त्यामुळे राज्य सरकारचा त्यासाठी तयार केलेला चेक कुठे हरवला हे शोधावे लागेल,’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला आहे.