हायलाइट्स:
- पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक सक्रीय करोना रुग्ण
- राज्यात आज २ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले
- आज मृत्यूंची संख्या झाली कमी
राज्यात आज राज्यात २ हजार ३८४ नवीन रुग्णांचे निदान (Maharashtra Corona Cases Today) झालं असून आज २ हजार ३४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१३,४१८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के एवढे झाले आहे.
मृत्यूसंख्येत काहीशी घसरण
राज्यातील करोना रुग्णसंख्या स्थिर असलेली तरी मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. राज्यात आज ३५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. काल बुधवारी ही संख्या ४९ एवढी होती, तर मंगळवारी राज्यात ४३ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले होते.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०६,८३,५२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८६,२८० (१०.८५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,२४९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,०७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सक्रीय रुग्णांची संख्या पुण्यात अधिक
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ मुंबई, पुणे आणि अहमदनगर या तीनच जिल्ह्यांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत ५ हजार ९९७, पुणे जिल्ह्यात ८ हजार २८१ आणि अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.