धाराशिव साखर कारखाना उच्चांकी गाळप करणार – चेअरमन अभिजीत पाटील

पंढरपूर /नागेश आदापूरे, 03/11/2021- धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी उस्मानाबाद (युनिट क्र.१) सन२०२१-२२ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ सौ.स्नेहल व विजयकुमार देशमुख व सौ.सुचिता व रविराजे देशमुख या उभयतांच्या हस्ते करण्यात आला.

काट्यावर भरून आलेल्या वाहनांचे पूजन कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले, सर्वाधिक पाऊस चांगला पडल्याने उस्मानाबाद जिल्ह्य़ात ही पहिल्यांदाच सर्व धरणे, तळे, नाले, ओढे, नद्या तुडूंब वाहत आहेत. त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन ऊसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढवावे. या दिवाळी सणानिमित्त कामगारांचीही दिवाळी गोड व्हावी याकरिता कामगारांना १५ दिवसाचा पगार बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले. शेतकरी बांधवांना १३६रू. बील खात्यावर जमा करण्यात येईल तसेच येणाऱ्या हंगामात उच्चांक गाळप करण्याचा मानस आहे असे अभिजित पाटील म्हणाले. यावेळी कारखान्यातील अधिकारी कर्मचारी, कामगार व शेतकरी सभासद बांधव, तोडणी ठेकेदार यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक रणजीत भोसले, दिपक आदमिले, विकास काळे, येरमाळा ,सुनील पाटील,रणजीत कवडे,सुमित जगदाळे यांसह ऊस उत्पादक शेतकरी,वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी जनरल मॅनेजर गायकवाड,प्रवीण बोबडे, चिफ केमिस्ट,चिफ इंजिनीअर,शेतकी अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.